श्री गजानन महाराज विजय ग्रंथ भाग -२

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति । माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥ तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता । विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥ तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी । आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥ माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता । लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥ असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला । धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥ त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची । कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥ तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास । तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥ येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥ बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला । आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान । जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥ बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी । षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥ प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून । मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥ शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी । एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥ गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत । कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥ बहुमोल हिर्‍याची । वामकरीं घातिली पौची । रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥ जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे । त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार । त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥ एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं । ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥ बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार । ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥ श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण । महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥ या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी । मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥ त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता । ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥ त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन । श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥ असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें । हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥ मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्‍याचा । मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥ अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श । या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥ अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण । केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥ जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी । मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥ हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला । तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥ माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी । तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥ ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले । चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥ दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन । हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥ त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे । ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥ त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं । परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥ वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून । ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥ जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची । पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' । ऐसें म्हणोनिया वदनीं । कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥ अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें । वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥ हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण । तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥ आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला । संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥ बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास । परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥ असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा । होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥ त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली । एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥ फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर । तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥ अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर । ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥ नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं । नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥ तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार । हें फाटकें धोतर । पोतेर्‍यांच्या उपयोगी ॥४७॥ तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी । हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥ तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून । यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥ पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना । भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार । गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥ श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत । परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥ पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी । त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥ त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें । काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥ हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान । जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥ तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं । तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥ तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला । उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥ वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें । तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥ ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली । ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥ पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर । जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥ माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी । जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥ डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन । मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥ पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी । चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥ तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर । जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥ अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी । लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥ परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा । हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥ ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? । ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥ लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला । परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥ दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं । श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥ यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा । चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥ गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले । आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥ म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार । बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥ शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा । झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥ समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? । वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥ पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें । मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥ एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला । तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥ पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार । मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥ त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण । म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥ तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी । म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥ ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण । अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥ काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची । खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥ देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा । तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥ स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान । त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥ अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली । ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥ त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं । नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥ हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा । तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥ ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील । खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥ कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे । बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥ नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार । तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥ बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका । एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥ तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं । बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥ गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष । मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥ शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर । संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥ मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी । तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥ ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार । झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥ त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी । काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥ निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर । स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥ हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा । पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥ माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला । आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥ माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी । नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥ प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला । जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥ जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर । संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥ देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् । मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥ माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं । पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥ तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य । तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥ आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई । या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥ लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर । जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥ लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती । जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥ कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून । पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥ चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति । यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥ गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य । खापर्‍या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥ तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला । फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥ मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली । श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥ आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं । चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥ याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन । येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥ तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें । ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥ जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला । कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥ तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें । उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥ श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत । इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥ त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी । जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥

मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा । आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥ आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत । एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥ शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून । महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥ तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला । जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥ त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान । आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥ राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी । म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥ ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता । महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥ म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण । चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥ ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला । श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥ मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून । तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥ तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत । परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥ तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी । मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥ जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल । तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥ ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली । समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥ कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत । सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥ भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें । बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥ सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला । भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥ म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची । आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥ समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान । जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥ राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी । जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥ व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून । त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥ जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां । हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥ हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली । त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥ बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' । त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥ आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला । परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥ तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित । तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥ तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा । समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥ मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला । द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥ यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत । सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥ विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा । जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

अध्याय १३
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा । हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥ तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता । गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥ तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन । ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥ दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला । रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥ तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा । दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥ मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी । मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥ ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत । माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥ आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण । विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥ भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली । वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥ गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत । मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥१०॥ कुबेर त्यांचा भंडारी । मग कशास फिरतां दारोदारीं ? । चिठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥ ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन । या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्‍यासाठीं ॥१२॥ श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठ-मठीं । ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥१३॥ स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा । अवघीं वनें हा बगीचा । पलंग ज्यांचा मेदिनी ॥१४॥ अष्टसिद्धि दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं । तो न तुमची पर्वा करी । त्याचें वैभव निराळें ॥१५॥ सविता सूर्यनारायण । त्यासी दीप कोठून । प्रकाश देऊं शकेल जाण । प्रतिकार करण्या तमाचा ॥१६॥ तो मुळींच प्रकाशमयी । त्याला दीपाचें काज नाहीं । हलकारा तो कोठून होई । सार्वभौमा भूषविता ? ॥१७॥ इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची । ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥१८॥ रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली । प्राणासाठीं नसे झाली । ती हें ध्यानीं धरा हो ॥१९॥ रोग भय शरीरास । नाहीं मुळींच प्राणास । जन्ममरण हेंही त्यास । नाहीं मुळीं राहिले ॥२०॥ तैसी तुमची सुसंपन्नता । रक्षण व्हाया सर्वथा । पुण्यरुप औषधी आतां । मिळणें भाग आहे कीं ॥२१॥ संपन्नता हें शरीर । रोग त्याचें अनाचार । त्याचा नाश होणार । या पुण्यरुप औषधीनें ॥२२॥ म्हणून पुण्यसंचय करा । कुतर्क ना चित्तीं धरा । पुण्य मेदिनीमाजीं पेरा । करा आपुल्या संपत्तीचा ॥२३॥ वीज पेरितां खडकावर । तें वायां जातें साचार । त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥ अनाचार दुर्वासना । हे खडक असती जाणा । तेथें टाकिल्यावरी दाणा । तो किडे पांखरें भक्षिती ॥२५॥ संतसेवेसमान । कोणतें नाहीं पुण्य आन । स्वामी सांप्रत गजानन । मुगुटमणी संतांचे ॥२६॥ संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा । एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥२७॥ त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥२८॥ ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर । खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥२९॥ नेता असल्या वजनदार । वर्गणी ती जमे फार । क्षुल्लकाच्यानें न होणार । कार्य कधीं वर्गणीचें ॥३०॥ असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं । झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥ बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें । दगड चुना रेतीचें । सामान गाडया वाहती ॥३२॥ त्या वेळीं समर्थस्वारी । होती जुन्या मठावरी । त्यांनीं विचार अंतरीं । ऐशा रीतीं केला हो ॥३३॥ आपण येथें बसल्याविणें । काम न चाले झपाटयानें । म्हणून कौतुक समर्थानें । केलें कसें तें परियेसा ॥३४॥ एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी । तो गाडीवान झाला दूरी । महार होता म्हणून ॥३५॥ तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? । आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ॥३६॥ महार बोले त्यावरी । महाराज तुमच्या शेजारीं । मी न बसे गाडीवरी । तें आम्हां उचित नसे ॥३७॥ मारुती रामरुप झाला । परी रामासन्निध नाहीं बसला । तो उभाच पहा राहिला । कर जोडूनी रामापुढें ॥३८॥ बरें बापा तुझी मर्जी । त्यास हरकत नाहीं माझी । बैलांनों, नीट चला आजी । गाडीवाल्यामागून ॥३९॥ बैल तैसे वागले । नाहीं कशास बुजाले । गाडीवाल्यावांचून आले । नीट सांकेतिक स्थलास ॥४०॥ समर्थ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले । तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥४१॥ ही जागा शेगांवांत । आहे दोन नंबरांत । त्रेचाळीस पंचेचाळीस । सातशें सर्व्हे नंबराच्या ॥४२॥ महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी । मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥४३॥ त्या दोन नंबरांतून । जागा थोडथोडी घेऊन । साधिला तो मध्य जाण । ऐसे चतुर कारभारी ॥४४॥ एक एकराचा हुकूम झाला । परी बांधकामाच्या वेळेला समाधिमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥ त्यासाठीं म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण । जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥४६॥ पुढार्‍यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्‍यांनीं । आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥४७॥ यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास । परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥४८॥ यामुळें पुढारी । थोडे घाबरले अंतरीं । त्यांत जो पाटील होता हरी । तो बोलला समर्था ॥४९॥ अकरा गुंठे जागेचा । तपास करावया साचा । एक जोशी नांवाचा । आला असे अधिकारी ॥५०॥ हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला । जागेबद्दल जो कां झाला । दंड तुम्हां तो माफ होईल ॥५१॥ त्या अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती । चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥५२॥ कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला । दंड गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥५३॥ मी करुन आलों चौकशी । जाऊन त्या शेगांवासी । या घडलेल्या प्रकारासी । दंड होणें उचित नाहीं ॥५४॥ म्हणून तो माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला । तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥५५॥ तो म्हणे समर्थांचें । वाक्य ना खोटें व्हावयाचें । मजवरी किटाळ महाराचें । येऊन गेलें नुकतें एक ॥५६॥ त्या वेळीं महाराजांनीं । भिऊं नकोस म्हणोनी । तुझ्या एकाही केसालागुनी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥ तेंच खरें अखेर । घडून आलें साचार । तैसाच हाही प्रकार । आज दिनीं झालासे ॥५८॥ समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें । असो शेगांवाचे लागले । लोक भजनीं स्वामींच्या ॥५९॥ आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडले प्रकार । म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥६०॥ मेहेरकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला । त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥६१॥ यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग । उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥६२॥ करपद बोटें झडून गेलीं । तनूप्रती चढली लाली । कानाच्या सुजल्या पाळी । कंडू सुटला तनूतें ॥६३॥ म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती । समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥६४॥ श्रोते त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत । तुला रक्तपिति आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥६५॥ महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई । कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥६६॥ हा स्पर्शजन्य रोग फार । म्हणून वैद्य डाँक्‍टर । सांगती याचा विचार । तूं आपल्या मनीं करी ॥६७॥ परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती । येता झाला सत्वर गतीं । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥६८॥ डोई ठेवितां पायावर समर्थांनीं चापट थोर । मारिली त्याच्या डोक्यावर ।अति जोरानें विबुध हो ॥६९॥ म्हणून तो उभा ठेला । समर्थास न्याहाळूं लागला । स्वामींनीं त्याचे थोबाडाला । दोन्ही करें ताडिलें ॥७०॥ फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ । खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥७१॥ तोच त्यांनीं मानिला । समर्थांचा प्रसाद भला । बेडका होता जो कां पडला । तयाचीया अंगावर ॥७२॥ तो त्यानें घेऊन करीं । चोळून अवघ्या शरीरीं । लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥७३॥ तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथें होता । तो गोसाव्यासी बोलतां । झाला पहा येणें रीति ॥७४॥ आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें । त्यावरी यांनीं टाकिलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥ तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला । जा लावून साबणाला । धुऊन टाकी सत्वर ॥७६॥ हे ऐसे वेडेपीर । विचरुं लागतां भूमीवर । त्यांशीं अंधश्रद्धेचे नर । साधु ऐसें मानिती ! ॥७७॥ त्याचा परिणाम ऐसा होतो । अविधि कृत्यांस ऊत येतो । तो येतां सहज जातो । समाज तो रसातळां ॥७८॥ यासी तुझेंच उदाहरण । तूं औषध घेण्याचें सोडून । आलास कीं रे धांवून । या वेडयापिशापाशीं ॥७९॥ गोसावी तें ऐकतां । हंसूं लागला सर्वथा । म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥८०॥ अमंगळ साधूपाशीं । कांहीं न राहतें निश्चयेंसी । कस्तुरीच्या पोटाशीं । दुर्गंधी ना वसे कदा ॥८१॥ तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा । कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥८२॥ तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास । हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥८३॥ त्यांत थुंक्याचें नांव नाहीं । अवघी औषधी आहे पाही । मी इतुका वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥ तुझा त्याशीं संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां । समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥८५॥ त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार । स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥८६॥ समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी । थल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥८७॥ ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला । तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥८८॥ मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची । तों गोसाव्याच्या हातींची । बसली औषधी होऊन ! ॥८९॥ कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित ! । दुर्गंधीही किंचित्‌ । येत होती तियेला ॥९०॥ तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं । कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥९१॥ असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसूं देत नव्हतें । हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥९२॥ आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा । अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥९३॥ ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें । लालीनें तें सोडिलें । जयाचिया अंगाला ॥९४॥ चाफे झाले पूर्ववत्‌ । भेगा पदींच्या निमाल्या समस्त । दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥९५॥

गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन । प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥ बायको गंगाभारतीची । अनुसूया नांवाची । ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥९७॥ संतोषभारती कुमार । होता तिच्याबरोबर । येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥९८॥ तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली । समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असें ॥९९॥ मुलगा तेंच बोलला । म्हणे बापा गांवीं चला । पुसून गजानन महाराजाला । येथें राहणें पुरें झालें ॥१००॥ गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडूं कर । आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥१॥ ही अनाथाची माउली । स्वामी गजानन येथे बसली । त्यानें माझी उतरली । धुंदी चापट मारुन ॥२॥ राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत । केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥३॥ ऐसें संकेतें बोलले । थापटया मारुन जागें केलें । आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥४॥ हे संतोषभारती कुमारा । तूं तुझ्या आईस नेईं घरा । येथें नकोस राहूं जरा । सवडद जवळ करावें ॥५॥ हिचें जीवमान जोंवरी । तोंवरी हिची सेवा करी । ही तुझी माय खरी । हिला अंतर देऊं नको ॥६॥ मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा । पुंडलिकाचा ठेवावा । इतिहास तो डोळ्यांपुढें ॥७॥ मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत्‌ । म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥८॥ आजवरी तुमचा होतों । आतां देवाकडे जातों । नरजन्माचा करुन घेतों । कांहीं तरी उपयोग ॥९॥ हा वायां गेल्या खरा । नराचा जन्म साजिरा । चुकेल चौर्‍यांशींचा फेरा । ऐसें साच सांगितलें ॥११०॥ समर्थकृपेनें निश्चिती । झाली मलाही उपरती । या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥११॥ ऐसें सांगून कुटुंबाला । मुलांसह सवडदाला । दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवीं ॥१२॥ पदपदांतरें समर्थांचीं । आवडीनें म्हणावीं साची । त्यास कला गायनाची। येत होती विबुध हो ॥१३॥ प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा । समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥१४॥ ऐकून त्याचें भजन । इतरांचेंही हर्षें मन । वस्तु अशीच आहे गान । रंजविणारी सर्वांतें ॥१५॥ हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला । मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥१६॥ असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी । बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥१७॥ मम भाच्याच्या गृहाला । अडगांवीं नेण्याला । मी आलों होतों आपणांला । तयीं आपुला करार ॥१८॥ ऐसा होता समर्था । मी नाहीं येत आतां । नको करुं आग्रह वृथा । पुढें मागें येईन ॥१९॥ त्याला दिवस झाले बहुत । आतां चला मुंडगांवांत । मी आहें आपुला भक्त । माझी इच्छा पूर्ण करा ॥१२०॥ मुडंगांवात माझे घरीं । कांहीं दिवस राहा तरी । मी अवघी करुन तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥ झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवीं आले साधुवर । दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥२२॥ झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा । मुंडगांव झालें गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥२३॥ पैठणामाजी एकनाथ । मुंडगांवीं गजानन संत । भजनी दिंडया अमित । आल्या भजन करावया ॥२४॥ आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका । तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥२५॥ झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी । भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥२६॥ झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार । लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥२७॥ स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहार दृष्टीनें । योग्यपरी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥ झ्यामसिंगा, हें अन्न । न येईल उपयोगाकारण । तुम्हां प्रापंचिकालागून । आपलेंच व्हावें वाटतें ॥२९॥ पंक्ती बसल्या भोजना । तों एका एकी आकाश जाणा । भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघाची ॥१३०॥ चमके वीज माथ्यावरी । झंझावात सुटला भारी । कडकडा ती कांतारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥ घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें । मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥ आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी । हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥३३॥ निवाराया पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा । आगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥ आतां पाऊस पडेल । तरी शेतीचें होईल । वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥ झ्यामसिंगे केलें पुण्य । हा भंडारा घालून । तें भोंवलें आम्हांलागून । वा खूप तर्‍हा पुण्याची ॥३६॥ तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा । तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥३७॥ आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी । पाहूं लागला पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥३८॥ मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें । हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥ दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला । तो नियम चालला । अजून या मुंडगांवीं ॥१४०॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली । महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥४१॥ लोक त्या मुंडगांवांत । समर्थाचे झाले भक्त । पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्‍या असे ॥४२॥ हा उकिरडया नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा । भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारीं ॥४३॥ हें उकीर्डा नाम वर्‍हाडांत । पोर नसल्या वांचत । लोक नवसें ठेवितात । ऐसा प्रघात त्या प्रांतीं ॥४४॥ तें पेंटय्या तेलंगणांत । केर पुंजा महाराष्ट्रांत । तैसा उकीर्डा वर्‍हाडांत । नांव ठेविती बालकाचें ॥४५॥ हा पुंडलिक वद्य पक्षासी । करावया वारीसी । येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥४६॥ जैसें कां ते वारकरी । वद्यपक्षामाझारीं । जाती इंद्रायणीचे तीरीं । देहू आळंदी गांवाला ॥४७॥ तैसाच हा वर्‍हाडांत । वारी वद्यपक्षांत । करी येऊन शेगांवांत । परम भावभक्तीनें ॥४८॥ असो एकदां वर्‍हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात । बळावला अत्यंत । गांव बाहेर पडलें कीं ॥४९॥ या तापांत ऐसें होतें । प्रथमतां थंडी वाजते । अंग ज्वरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥ आणि कोठें तरी सांध्यावर । ग्रंथि उठे सत्वर । ती होतां करी जोर । वात तिच्या मागुनी ॥५१॥ मग रोगी बरळतसे । शुद्धि न कांहीं राहातसे । तलखी अंगाची होत असे । बेशुद्ध होई क्षणक्षणां ॥५२॥ पूर्वीं हा रोग विपरीत । नव्हता भरतखंडांत । त्याचा वास युरोपांत । होता मोठया प्रमाणीं ॥५३॥ ती सांथ इकडे आली । गांवोगांव पसरली । त्याच्या प्रतिकारा सोडून दिलीं । लोकांनीं तीं घरेंदारें ॥५४॥ त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी। तों पुंडलिकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥५५॥ कसकस त्याला घरींच आली । परी ती त्यानें चोरिली । शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥५६॥ येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर । एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥ गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत । ऐसें पाहून पुसे तात । कां रे पुंडलिका ऐसें करिशी ? ॥५८॥ पुंडलिक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला । गोळा एक कांखेला । उठला आहे येधवां ॥५९॥ शक्ति सारी क्षीण झाली । आतां मशीं न चालवे मुळीं । काय करुं ही राहिली । वारी हायरे दुर्दैवा ॥१६०॥ हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना । दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्त वत्सला कृपानिधी ॥६१॥ वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर । जरी सांडलें शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥६२॥ माझा पुण्यठेवा हीच वारी । ती रक्षण आतां करी । ही सांथ झाली वैरी । नाश तिचा करावयातें ॥६३॥ शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर । बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिति ॥६४॥ तोही रडूं लागला । हा एकुलता एक पुत्र मला । देवा न दिवा नेईं भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥ उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास । आणूं का या समयास । तुला बाळा बसावया ॥६६॥ पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी। उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥६७॥ मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास । नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥६८॥ बसत उठत पुंडलिक आला । अति कष्टें शेगांवाला । पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥६९॥ तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली । कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥१७०॥ आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका, तुझें गंडांतर | टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥७१॥ तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलिकाची गांठ जाणी । गेली जागच्या जागीं जिरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥ कंप अशक्‍ततेनें । राहिला देहाकारणें । करीं पुंडलिकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥७३॥ घांस त्या नैवेद्याचे । समर्थें घेतां दोन साचें । कांपरें तें पुंडलिकाचें । गेलें बंद होवोनिया ॥७४॥ पुंडलिक झाला पूर्ववत् । अशक्‍तता राहिली किंचित् । हें गुरुभक्‍तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥७५॥ गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी । कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥७६॥ सांग करुन वारीला । पुंडलिक गेला मुंडगांवाला । हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥७७॥ संतचरित्र ना कहाणी । अनुभवाची खाण जाणी । मात्र अविश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । सुखद होवो भाविकांप्रत । हेंच देवा मागणें ॥१७९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १४
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥ ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥ भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन । वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥ शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी । बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥ जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा । दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥ हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें । बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥ तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु । भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥ एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा । बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥ हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥ श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात । परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥ या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी । तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥ ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला । आली पाळी बिचार्‍याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥ घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण । लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥ विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें । भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥ तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर । भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥ कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान । पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥ ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला । पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥ जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन । संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥ बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी । अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥ जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी । तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥ जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल । सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥ यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया । आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥ ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर । अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥ एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली । तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥ श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं । भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥ बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी । अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥ तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा । तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥ तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें । व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥ आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी । याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥ ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला । तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥ आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें । घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥ आपल्या वर्‍हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत । आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥ संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी । उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥ ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून । म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥ किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें । कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥ कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी । ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥ दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून । कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥ अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये । प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥ आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून । तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥ नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया । परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥ तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला । ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥ जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ । बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥ त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी । खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥ काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें । खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥ त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा । नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥ ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण । आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥ रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला । बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥ तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर । एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥ त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत । पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥ करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया । जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥ त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण । मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥ घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची । वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥ जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां । वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥ बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले । मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥ दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला । गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥ तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? । ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥ आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून । उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥ जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥ ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला । बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥ एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती । जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥ या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन । या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥ म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली । तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥ मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल । यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥ बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी । घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥ चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले । ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥ तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर । घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥ हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना । आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥ तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून । बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥ महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं । उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥ मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान । तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥ तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली । होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार । तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥ जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला । मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥ आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून । ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥ कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी । लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥ महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक । नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥ तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान । तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥ म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें । माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥ मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण । आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥ समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत । मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥ ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले । पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥ नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट । मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥ कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले । कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥ कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा । थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्‍यांचा ॥८४॥ पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत । गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥ रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी । पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥ चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले । आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥ कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर । बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥ खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला । गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥ ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून । पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥ परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत । म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥ गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं । ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥ तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा । मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥ ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें । गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥ तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी । फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥ छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर । नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥ परी महाराज निर्धास्त होते । ' गिनगिन गणांत बोते ' । ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥ मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती । उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥ चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले । आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥ त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ । नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥ गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी । वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥ ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत । नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥ कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें । आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥ तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण । तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥ ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें । हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥ श्लोक ( अनुष्टुप छंद ) नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी । मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥ ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें । नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥ नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी । नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥ ळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश । भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥ नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली । आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥ ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण । बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥ सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें । तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥ मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका । आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥ मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर । ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥ क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी । वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥ तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार । कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥ बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? । तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥ तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां । तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥ कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर । माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥ अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा । संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥ म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार । जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥

ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण । समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥ परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात । होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥ सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले । शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥ या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण । हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥ या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत । ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥ सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला । तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥ सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण । गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥ वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं । अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥ त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत । मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥ थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी । भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥ आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले । विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥ वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन । पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥ रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला । जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥ तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला । त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥ मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा । आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥ म्हणा " साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा । तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास " ॥३६॥ हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें । घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥ माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत । महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥ गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें । भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥ ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा । येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥ त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न । हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥ बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला । जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥ पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं । खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥ संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी । सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥ ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा । स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥ योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी । भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥ शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत । आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥ ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी । हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥ जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत । वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥ खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना । हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥ योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर । करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

अध्याय १५
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा । तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥ राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें । तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥ आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला । आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥ या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार । देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥ एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता । पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥ अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी । कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥ शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा । देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥ देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें । आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥ तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार । मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥ टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर । दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥ निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी । ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥ करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य । सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥ वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें । धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥ कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली । ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥ तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला । लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥ झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची । मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥ दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान्‌ बडेबडे । जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥ अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे । नांव ऐकतां टिळकांचें । वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥ शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं । झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥ शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती । ती वर्‍हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥ त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला । वर्‍हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥ माता होती वर्‍हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी । अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥ आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा । आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥ आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी । ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥ अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले । तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥ या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला । श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥ शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा । समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥ टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्‍न । त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥ ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें । ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥ तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां । तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥ फिरेल नागवा सभेंत । "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत । मारील वाटे कदाचित्‌ । तो लोकमान्याला ॥३१॥ कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें । गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥ त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेडयाकारण । जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥ खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक । तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥ खर्‍याखोटयाची परीक्षा । साधूच हे करिती देखा । म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥ ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली । आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥ येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी । आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥ वेडयापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं । सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥ करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर । याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥ स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा । शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥ त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास । तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥ पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा । यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥ यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें । खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥ बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास । तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥ मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला । चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥ खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार । आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥ वर्‍हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें । कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥ शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं । वर्‍हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥ सण अक्षय्यतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा । परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥ तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण । लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥ शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी । ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥ मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला । म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥ परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं । साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥ सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी । गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥ सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा । त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥ श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान । खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥ दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई । सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥ आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार । त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥ सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला । मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥ "दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन । स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥ त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची । जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥ त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला । म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥ तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले । श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥ म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी । अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥ स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला । स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥ यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न । ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥ ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती । तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥ ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले । गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥ आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत । जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥ त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला । आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत । ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥ सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली । खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥ भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला । दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥ राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें । वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥ प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची । त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥ दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे । ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥ अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं । बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥ तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी । सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥ मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें । तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥ लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त । येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥ तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते । तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥ कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं । जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥ कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची । कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥ जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड । ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥ चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले । तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥ अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला । होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥ सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना । कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥ ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर । टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥ या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी । जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥ ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर । समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥ ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला । वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥ तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत । स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥ यश तुमच्या प्रयत्‍नासी । नाहीं निश्चयेंसी । आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥ जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो । हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥ माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी । ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥ भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन । आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥ प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी । दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥ झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास । तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥ हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी । मान जगत्‌-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥ या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार । त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥ बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी । केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥ कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर । कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥ हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी । या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥ येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर । कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥ स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते । पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥ त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥ गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई । आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥ यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥ असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्‌पावन जातीचा । श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥ तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत । आंग्‍लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥ पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला । म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥ तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र । तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥ आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला । उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥ टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून । अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥ तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें । ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥ द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत । घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥ तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी । जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥ त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला । तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥ मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें । दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥ चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला । त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥ दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त । उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥ पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं । आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥ दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत । बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥ मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा । म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेडया करुं नको ॥२४॥ अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत । सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥ त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं । कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥ ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे । बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥ तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती । याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥ ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी । हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥ अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन । या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥ तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला । योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥ तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई । ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥ पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला । विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥ एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन । कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥ महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही । कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥ जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत । तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥ श्रीधर बी.ए.एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें । शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥ संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर । त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥ पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला । म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥ हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें । वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय १६
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥ तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण । ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥ आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? । काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥ म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका । आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण । आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥ गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत । महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥ हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी । हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥ त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही । निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥ ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार । भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥ ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला । कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥ गजाननाच्या वार्‍या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी । परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥ अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण । शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥ तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला । या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥ ' गिन गिन गणातें ' हें भजन । पिशापरी आचरण । कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥ म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें । केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥ उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण । तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥ गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी । गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥ यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं । म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥ तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक । भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥ त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला । जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥ ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण । अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥ दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला । तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥ पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर । उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥ पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? । गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥ जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ । तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥ कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला । लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥ मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे । नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥ तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण । ' गण गण ' ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥ आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास । ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥ पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून । तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥ पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया । नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥ बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार । पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥ पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला । तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥ जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार । तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥ उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना । म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥ स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण । कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥ तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी । ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥ किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन । ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥ मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या । त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥ ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं । तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥ अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां । दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥ पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं । मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥ मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला । तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥ तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही । आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥ झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत । दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥ तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला । तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥ या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी । समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥ करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा । भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥ त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन । तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥ झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत । पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥ प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? । हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥ सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला । खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥ पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची । ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥ लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या । त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥ दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण । मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥ पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त । आडमार्गानें किंचित्‍ । जाऊं न देती तयांला ॥५६॥ निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात । तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥ एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून । होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥ सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार । मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥ या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती । म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥ या कवराकारण । दोन पुत्र होते जाण । गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥ कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती । तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥ लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान । म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥ कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी । राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥ एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून । त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥ तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं । जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥ पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे । परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥ भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां । मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥ घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी । जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥ माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी । आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥ भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची । ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥ हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? । हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥ ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत । तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥ नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? । मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥ भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? । माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥ पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण । म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥ नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार । तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥ ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी । मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥ तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला । नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥ गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे । आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥ तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल । पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥ तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं । यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥ सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? । कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥ मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही । तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥ भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर । ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥ भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्‍याचें चून जाण । लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥ नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला । वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥ ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी । भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥ ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां । पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥ तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची । तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥ अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला । म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥ मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? । आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥ अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं । म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥ हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा । माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥ ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी । नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥ गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी । ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥ थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार । मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥ मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों । म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥ तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण । तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥ ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित । चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥ कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा । न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥ नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत । पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥ कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर । कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्‍या कोणाच्या ॥३॥ परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला । वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥ आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून । आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥ त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति । त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥ तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा । आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥ मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें । नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥ ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला । समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥ दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी । झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥ समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार । उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥ त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन । बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥ तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों । नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥ ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता । म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥ कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं । काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥ ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी । कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥ त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण । एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥ तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां । कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥ जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत । सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥ तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें । भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥ भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला । सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥

समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी । पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥ भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया । यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥ आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान । सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥ ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला । समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥ शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार । एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥ घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं । अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥ चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन । कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥ ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा । घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥ जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत । एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥ तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी । नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥ ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला । तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥ तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला । ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्‍याच्या दृष्टीसी ॥३३॥ त्याची शिकार करण्या भली । शिकार्‍यानें आपुली । नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥ त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला । त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥ छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर । थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥ कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना । होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥ मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित । नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥ ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत । एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥ डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता । नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥ कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास । झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥ तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल । कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥ मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी । शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥ तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें । अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥ ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली । तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥ झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून । जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥ तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें । दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥ ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची । प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥ ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर । संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १७
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥ हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर । तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥ प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं । रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥ दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥ त्या भयंकर रुपाची । भीति नसे  साची । पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥ तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया । ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥ तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत । पुरविशी भक्‍तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥ त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी । दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥ गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥ चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण । गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥१०॥ जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत । त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥११॥ एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ । खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥१२॥ एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी । त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥१३॥ त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला । हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥१४॥ तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ । विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥१५॥ भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी । भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥१६॥ मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे । आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥१७॥ तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा । येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१८॥ फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील । याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥१९॥ दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण । मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥२०॥ भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं । चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया ! ॥२१॥ मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका । मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥२२॥ ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी । चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥२३॥ ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन । मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥२४॥ भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी । बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥२५॥ महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले । जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥२६॥ तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा । डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥२७॥ जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला । योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥२८॥ आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार । त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥२९॥ पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं । महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥३०॥ अरे वेडया नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा । बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास ? ॥३१॥ हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां । अधिकार्‍याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥३२॥ मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला । म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥३३॥ दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें । योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥३४॥ मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीतीं बोलला । तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥३५॥ हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर । याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥३६॥ तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी । मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥३७॥ आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित । मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥३८॥ स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी । बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥३९॥ तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें । कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥४०॥ महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती । कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥४१॥ त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली । शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो ! ॥४२॥
17

बापुसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर । डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥४३॥ व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही । तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥४४॥ महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि । म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥४५॥ तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष । तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥४६॥ जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें । कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥४७॥ तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून । पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥४८॥ त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं । म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥४९॥ हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न । बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥५०॥ श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची । मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥५१॥ तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना । तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥५२॥ खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली । ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥५३॥ जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला । याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥५४॥ कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें। तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥५५॥ तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी । अधिकार्‍यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥५६॥ बर्‍या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें । ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥५७॥ तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून । तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥५८॥ शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला । रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥५९॥ हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ । करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥६०॥ शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला । त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥६१॥ जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें । लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥६२॥ इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर । बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥६३॥ मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले । या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥६४॥ ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं । तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥६५॥ गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य । जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥६६॥ या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत । कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥६७॥ नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा । म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥६८॥ ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून । आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥६९॥ तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी । उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥७०॥ तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन । जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥७१॥ हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा । किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥७२॥ हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त । नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥७३॥ जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा । परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥७४॥ अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून । तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥७५॥ तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान । म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥७६॥ वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही । तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥७७॥ ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला । आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥७८॥ महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित । भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥७९॥ म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला । ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥८०॥ समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी । करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥८१॥ भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला । तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥८२॥ समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं । विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥८३॥ हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास । भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥८४॥ या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी । बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥८५॥ याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा । होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥८६॥ त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं । जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥८७॥ अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर । बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥८८॥ तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले । अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥८९॥ अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास । जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥९०॥ तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं । त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो ! ॥९१॥ तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला । आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥९२॥ पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून । कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥९३॥ महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते । अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥९४॥ दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला । महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥९५॥ महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास । त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ! ॥९६॥ यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण । यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥९७॥ या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी । मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥९८॥ तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव । दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥९९॥ हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर । याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥१००॥  ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा । साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥१॥ जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले । कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥२॥ महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं । जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥३॥ शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून । तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥४॥ म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना । या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥५॥ दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत । मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥६॥ परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं । तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥७॥ तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत । मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें ? ॥८॥ काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले । याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥९॥ त्यात होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत । मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥११०॥ महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले । भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥११॥ आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी । म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥१२॥ तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें । महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥१३॥ श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी । परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥१४॥ अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे । मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥१५॥ तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला । तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥१६॥ ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण । काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥१७॥ महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं । आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥१८॥ गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला । आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥१९॥ समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण । होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥१२०॥ धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य । तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥२१॥ खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची । ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥२२॥ सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें । आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥२३॥ यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा ? । पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥२४॥ तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान । हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥२५॥ धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी । परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥२६॥ हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी । जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥२७॥ महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले । या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥२८॥ पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी । परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥२९॥ शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा । हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो ! ॥१३०॥ असो या बापुरावाची । कांता एक होती साची । तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥३१॥ मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात । घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥३२॥ बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार । कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥३३॥ या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी । क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥३४॥ भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला । आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥३५॥ खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित । अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥३६॥ महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला । केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥३७॥ तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! । तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥३८॥ ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन । तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥३९॥ जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली । गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥१४०॥ ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन । केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥४१॥ त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची । नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥४२॥ असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत । नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥४३॥ त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी । जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥४४॥ पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले । आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥४५॥ पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं । नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस ! ॥४६॥ गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती । आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥४७॥ तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ! । या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥४८॥ त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा । ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥४९॥ खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा ! । जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥१५०॥ तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित । श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥५१॥ हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी । वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥५२॥ लोकां म्हणती गजानन । या रे स्नाना
लागून । नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥५३॥ गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी । स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥५४॥ भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान । घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥५५॥ संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी। त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥५६॥ स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें । विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥५७॥ नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन । शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥५८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥१५९॥ शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १८
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा । हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥ हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना । हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥ काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी । तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥ भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी । ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥ म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा । सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥ अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं । तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥ हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥ बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी । ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥ बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥ परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला । तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥ बायजेकडे पाहून । जननी करी रोदन । माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥ भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी । दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥ शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर । हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥ कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं । बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥ नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी । तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥ ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून । आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥ बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा । तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥ डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर । जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥ तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी । इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥ त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना । म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥ हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं । आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥ झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन । वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥ ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें । कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥ परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना । ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥ बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण । त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥ जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला । दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥ बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही । कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥ ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं । आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥ तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर । कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥ तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार । सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥ ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना । होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥ अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत । तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥ खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी । बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥ बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा । अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥ मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन । अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥ त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला । पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥ भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी । महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥ तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी । महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥ बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर । कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥ तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले । अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥ जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात । उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥ तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला । घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥ परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं । निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥ समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत । त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥ पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला । शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥ त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले । तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥ पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी । ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥ पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी । तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥ हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें । तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥ बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य । यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥ परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी । गण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥ पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता । बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥ पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं । म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥ या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार । नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥ भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं । पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥ ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? । कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥ वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला । कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥ भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी । लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥ ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते । एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥ जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस । सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥ संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते । पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥ भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही । चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥ पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन । कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥ लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती । दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥ भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष । हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥ शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला । ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥ ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी । जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥ तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला । माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥ ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून । गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥ घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला । पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥ महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात । ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥ भाऊ राजाराम कवर । एक   डाँक्टर । पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥ त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला । औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥ बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती । शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥ नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं । शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥ कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला । वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥ भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी । शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥ आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय । याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥ पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ । या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥ ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं । रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥ तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र । कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥ तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली । गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥८२॥ कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा । मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥ दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी । डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥ तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला । दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥ डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं । प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥ ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान । तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥ डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला । हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥ प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत । मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥ तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण । त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥ परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला । भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥ फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा । येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥ एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार । पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा ? ॥९३॥ भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली । हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥ दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास । माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ५॥ हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून । हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥ त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन । लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥ कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण । अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥ असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं । त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥ होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार । स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥ जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी । सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥ त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार । येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥ झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे । आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥ हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा । प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥ म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे । रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥ या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन । अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥ हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी । बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥ आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा । समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥ 
मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी । पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥ तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार । भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥ प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी । ' जय जय रामकृष्ण हरी ' । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥ शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला । ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥ नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार । श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥ या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा । भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥ त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत । सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥ श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला । उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥ हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं । दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥ लिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं । पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥ एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर । बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥ बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला । म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥ स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी । दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥ मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत । राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥ मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना । केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥ बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी । कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥ तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून । तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥ ' अरण ' होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास । मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥ तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ । मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥ ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला । परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥ मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण । बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥ शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी । फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥ बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण । हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥ शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा । येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥ याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? । ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥ कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला । तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥ त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत । वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥ आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन । बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥ मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? । कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥ अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती । शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥ सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान । न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥ ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा । अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥ तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत । ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥ गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे । सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥ समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना । ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥ तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें । पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥ तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी । बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥
पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी । तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥ धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला । तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥ इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस । होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥ ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन । बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥ तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं । ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥ म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण । निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला । कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥ संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात । गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥ काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी । बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥ याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण । रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥ पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें । म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥ कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा । तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥ तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी । त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥ प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत । यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥ वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती । चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥ हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी । ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥ गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी । कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥ पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत । शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥ वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला । कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥ लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥ तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर । म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥ लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया । याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥ पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार । मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥ अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं । चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥ तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? । आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥ ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें । त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥ चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता । वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥७२॥ समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त । तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥ तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर । त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥ वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती । संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥ घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी । चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥ आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी । म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥ ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार । आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥ पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी । मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥ एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन । त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥ तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती । म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥ सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती । खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥ व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत । हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥ सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें । अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥ तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत । पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥ त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न । आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥ याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती । या वेड्यातें वंदिताती । " महाराज, महाराज, " म्हणून ॥८७॥ जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून । झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥ त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां । येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥ आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित । कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥ तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला । अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥ कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर । पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥ ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला । आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥ परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर । घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥ ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी । स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥ तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर । म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥ मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली । ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥ माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा । वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥ तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर । करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥ श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली । कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥ प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत । समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १९
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा । माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥ हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती । माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥
खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता । याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥ मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका । हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥ महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ । जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥ तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां । मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥ माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें । लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥ माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण । आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥ तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली । काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥ जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।  भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥ म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं । तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥ त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना । निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥ तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही । तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥ तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर । मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥ तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला । त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥ असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी । गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥ ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी । त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥ स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला । परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥ गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार । रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥ असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा । वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥ त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ । जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥ बुटीचा ऐसा विचार । या ताबर्डीवर । महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥ अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला । तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥ शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित । 
विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥ कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? । तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥ तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार । बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥ टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची । येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥ जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला । जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥ तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें । आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥ इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत । जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥ महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी । या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥ तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना । अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥ बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी । श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥ रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन । परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥ जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना । बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥ शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले । परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥ इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी । घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥ बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत । त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥ अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं । तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥ तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार । तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥ तुझ्या धनाच्या जोरावरी । उडया या जाण निर्धारी । तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥ हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला । परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥ गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी । पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥ ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास । होत्या पातळ पदार्थांस । वाटया जवळ चांदीच्या ॥४४॥ नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें । मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥ ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? । ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥ असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत । तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥ वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून । तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥ चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी । तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥ समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें । अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥ विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया । दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥ तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी । तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥ येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज । पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥ आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी । आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥ भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ । शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥ भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी । दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाडयांत ॥५६॥ कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें । परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥ तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं । माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥ तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें । ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥ आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला । अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥ ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन । त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥ हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी । ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥ त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें । शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥ उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार । त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥ तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून । शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥ धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत । होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥ अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं । त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति । कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥ ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार । बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥ अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक । मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥ तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं । चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥ चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी। जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥ तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न । हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥ ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी । तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥ एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां । हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥ एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर । एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥ एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती । एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥ स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले । आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥ स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली । तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥ फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान । स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥ बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां । संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥ त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून । ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥ ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला । बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥ ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे । हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥ स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण । तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥ सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान । या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥ हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं । तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥ अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां । म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥ येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी । परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥ आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें । भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥ मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥ दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां । श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥ मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥ या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी । भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥ परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण । जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥ आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा । या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥ परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं । योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥ जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत । त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥ आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख । धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥ कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा । आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥ या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें । परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥ जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण । म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥ काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर । हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३ आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक । शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥ तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची । बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥ मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार । जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥ पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला । अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥ या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत । मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥ वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी । हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥ व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर । उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर । हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥ जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला । तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥ तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं । कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥ नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार । ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥ नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार । दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥ शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत । सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥ तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत । मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥ पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा । जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥ खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई । गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥ पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा । आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥ मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण । तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥ या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें । परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥ मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं । जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥ आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी । कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥ जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल । आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥ आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही । निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥ ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥ ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला । उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥ कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत । तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥ ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला । प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥ अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले । वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥ मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर । वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥ साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची । ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥ तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी । डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥ जे येतील तयांना । साळु घाल भोजना । येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥ ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत । जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥ खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं । त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥ पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा । होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥ या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी । तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥ प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न । गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥ श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी । शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥ चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? । बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥ आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी । विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥ स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी । हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥ तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता । आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥ त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती । आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥ ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान । न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥ शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी । मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥ प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून । चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥ समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत । पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥ मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली । शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥ इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर । येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥ भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला । तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥ ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण । ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥ मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा । तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥ श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत । पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥ तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं । गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥ उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर । खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांडयाच्या ॥६०॥ राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला । ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥ हा पांडया मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त । म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥ क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी । अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥ ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन । महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥ तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां । म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥ पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी । विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥ तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर । रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥ आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची । पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥ ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर । नफातोटयाची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥ तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता । म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांडयाकारणें ॥१७०॥ कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची । उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥ ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण । तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥ महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी । दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥ ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली । खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥ मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार । वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥ दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें । उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥ ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला । दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥ महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी । बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥ मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन । तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥ तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां । झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥ मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला । गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥ म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले । रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥ ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी । मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥ आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार । लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥ आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! । सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥ खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला । तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥ ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून । लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥ मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें । खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥ ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर । आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥ ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती । आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥ छे ! छे ! वेडया ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस । नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥ तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी । दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥ रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत । आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥ तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला । उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥ ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें । पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥ गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं । तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥ शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी । असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥ तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची । त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥ मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर । त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥  तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां । त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥ नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें । समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥ तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत । साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥ ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला । लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥ हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ । ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥ वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी । परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥ ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून । आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥ तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर । उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥ कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी । वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥ या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत । आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥ तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें । अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥ हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें । कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥ हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ । तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥ ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे । तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥ तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले । त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥ एका पंधरवडयांत । हवालदाराचे अवघे आप्त । होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥ म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी । वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥ नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर । गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥ अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा । तेथील हरी जाखडयाचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥ हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण । गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥ तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी । बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥ तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन । कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥ तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी । येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥ कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार। निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥ आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें । ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥ संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण । मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥ हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! । संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥ ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी । प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥ ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त । थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥ या हरी जाखडयानें । बावंच्या मागला मजकारणें । म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥ संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया । यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥ पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी । सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥ ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखडयासी पाहिलें । जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥ तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून । होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥ जा आतां परत घरा । सुखें करी संसारा । करीत असावा परमेश्वर । आठव वेडया ! विसरुं नको ॥३४॥ ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन । दिलें हरी जाखडयाकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥ हरी जाखडया संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं । महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥ ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥ बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर । तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥ हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत । इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥ वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती । हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥ फलभारें तरुवर । वांकले असती अपार । वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥ असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी । एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥ तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास । लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥ पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर । कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥ षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥ गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! । सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥ त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार । शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला । आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥ ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले । भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशा&n

ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥ बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर । तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥ हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत । इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥ वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती । हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥ फलभारें तरुवर । वांकले असती अपार । वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥ असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी । एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥ तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास । लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥ पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर । कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥ षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥ गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! । सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥ त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार । शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला । आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥ ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले । भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥ हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची । सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥ जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी । करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥ योगाभ्यास ही समोरी । त्या खेडयाच्या आदरें करी । त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥ तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥ एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं । त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥ म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला । जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥ तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण । मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥ दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली । आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥ तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण । औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥ नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली । धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥ ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण । नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥ तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया । अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥ ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं । हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥ व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार । आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥ तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं । बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥ हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत । शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥ असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी । घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥ जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा । जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥ जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती । जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥ पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान । गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥ हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था । हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥ तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर । जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥ आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें । पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥ देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी । अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥ ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी । अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥ हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता । अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥ किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा । म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥ महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर । सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥ तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं । इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥ चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला । तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥ पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें । चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥ तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस । संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥ पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला । पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥ गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी । आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥ कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित । चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥ त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण । दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥ तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला । या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥ दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित । तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥ हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी। ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥ जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले । शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥ चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास । बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥ मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥ ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण । दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥ शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥ प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला । सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥ देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन । स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥ पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ । ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥ गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी । गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥ गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा । विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥ अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? । कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥ मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल । ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥ श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी । विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥ आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस । हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥ आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती । अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥ ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल । नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥ गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे। ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥ त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी । तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥ त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया । पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥ लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं । जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥ तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता । एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥ निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित । आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥ तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें । भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥ दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत । आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥ तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला । लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥ रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार । सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥ रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी । दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥ मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात । रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥ वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार । होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥ तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले । फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥ बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती । कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥ ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर । उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥ समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी । रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥ पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर । भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥ जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा । अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥ ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी । उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥ अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण । ’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥ मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥ दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ । घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥ खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा । सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥ स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ । भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय २०
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥ तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं । मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥ माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून । राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥ यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष । खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥ म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा । पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥ असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥ शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती । आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥ समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर । कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥ ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥ जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥ तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥ ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां । गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥ हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा । नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥ अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी । बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥ एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस । उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥ केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी । शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥ तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां । हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥ उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी । कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥ हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें । दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥ फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती । गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥ हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण । तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥ तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी । उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥ त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें । प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥ यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर । येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥ अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां  न । तें न जाय अनाठायीं ॥२६॥ पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी । म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥ ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस । तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥ आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार । सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥ मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची । तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥ असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें । त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥ या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची । जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥ लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां । बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥ कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत । हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥ घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या  ला मनें । कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥ असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं । तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥ आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा। ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥ तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य । ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥ तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी । चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥ गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर । यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥ पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी । तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग  ॥४१॥ पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? । अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥ उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास । हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥ खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण । म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥ लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला । तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥ मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी । प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥ अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥ एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी । आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥ हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर । त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥ दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली । अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥ आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन । ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥ जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी । रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥ तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून । आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥ मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें । पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥ जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार । जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥ शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी । जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥ दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात । जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥ झंझावात बळावला । कडकडाट करी चपला । मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥ मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा । शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥ शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण । तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥ तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं । बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥ हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां । अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥ कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥ तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन । करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥ दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन । मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥ तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर । तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥ जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता । वाटेल तें करी   । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥ कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन । तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥ ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी । उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥ ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां । पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥ पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें । जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥ वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा । दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥ बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी । कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥ साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन । हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥ कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही । ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥ एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार । हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥ यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला । त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥ परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना । फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥ फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी । स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥ हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त । उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥ तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला । भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥ पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी । डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥ कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर । त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥ जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी । नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥ परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे । येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥ घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी । भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥ यादव म्हणे मनांत ।  भिकारी हा लोचट बहुत । नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥ त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन । सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥ दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य । फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥ तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें । तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥ हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन । आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥ कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण । श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥ पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे । श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥ ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार । तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥ त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी । रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥ ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता । कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥ भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी । होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥ पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले । तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥ यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला । तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥ संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? । कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥ तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार । माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥ तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? । ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥ फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात । तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥ रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी । यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥ परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला । ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥ सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं । फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥ तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या । विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥ विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत । तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥ आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला । तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥ समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं । निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥

भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर । त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥ म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला । सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥ गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची । वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥ बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं । अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥ तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित । आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥ ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत । कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥ आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों । नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥ बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला । घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥ रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी । वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥ तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला । कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥ गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार । डी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥ म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला । हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥ खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत । अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥ तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण । आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥ काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला । वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥ तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार । मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥ ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां । कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥ मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों । वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥ बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले । तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥ मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य । प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥ बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला । म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥ हे भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण । गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥ तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला । डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥ गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर । या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥ तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें । नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥ हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली । तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥ हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार । मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥ सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला । वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥ मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें । व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥ आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा । करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥  समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत । मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥ संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी । भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥ दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी । आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥ एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार । तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥ त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला । बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥ दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें । वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥ मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना । ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥ वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी । हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥ शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर । उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥ ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां । शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥ येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार । पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥ दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ । घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥ हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें । मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥ ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं । घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥ आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास । शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥ तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला । मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥ माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत । तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥ अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन । हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥ पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी । तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥ अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी । नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥ त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला । मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥ नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी । तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥ समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? । सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥ दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत । नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥ दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा । आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥ ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर । प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥ लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी । प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥ मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती । तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥ तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर । औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥ थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला । परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥ चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी । एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥ वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती । कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥ मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला । मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥ तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं । तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥ पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत । हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥ तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी । पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥ निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥ रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥ वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार । पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥ औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत । ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥ त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी । मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥ वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें । कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥ कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य । कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥ कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार । दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥ औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले । गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥ पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत । म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥ कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें । कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥ तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी । विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥ वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन । देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥ माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची । आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥ तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान । मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥ तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य । समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥ गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥ खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची । परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥ समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर । बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥ हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी । त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥ बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें । नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥ हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना । रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥ ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन । म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥ कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं । यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥ पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण । संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥ श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा । अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥ मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर । मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥ त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें । लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥ ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं । निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥ तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें । लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥ त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन । येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय २१
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥ देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥ पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥ म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी । धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥ म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा । काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥ तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन । या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥ सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत । कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥ तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई । अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥ पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा । आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥ कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी । दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥ तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत । अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥ श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण । तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥ एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची । त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥ बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर । एक होता मजूर । हाताखालीं गवंडयांच्या ॥१४॥ तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला । तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥ तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला । उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥ परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत । जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥ सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी । तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥ मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला । तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥ पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी । हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥ अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा । हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥ या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें । तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥ असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची । बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥ तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला । तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥ तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ । ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥ या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन । रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥ प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला । अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥ काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें । खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥ दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा । प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥ उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें । खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥ श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला । जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥ त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं । होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥ म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया । गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥ तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला । तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥ तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? । लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥ दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी । पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥ ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण । ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥ तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला । लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥ हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर । त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥ आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला । हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥ खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं । त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥ बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत । नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥ ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्‍याच्या मस्तकांसी । सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥ तोही गोल थोर होता । परी स्वामीची  ध सत्ता । कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा । परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥ एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी । ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥ भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? । ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥ पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक । गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥ निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी । स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥ गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत । दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥ गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला । कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥ कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं । अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥ तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर । कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥ उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं । कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥ आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन । मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥ पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा । तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥ परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख । त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥ आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं । पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥ तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला । तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥ तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं । ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥ समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना । योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥ तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी । तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥ बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत । बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥ का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी । पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥ पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण । त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥ द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये । राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥ साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून । दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥ हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास । होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥ आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी । साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥ अपमान खर्‍या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा । होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥ आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें। सोयर्‍याधायर्‍यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥ कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं । जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥ मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस । ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥ दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला । पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥ पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार । हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥ श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला । घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥ रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन । ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥ श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र । अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥ या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका । वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन । केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥ माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी । देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥ बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर । त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥ कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य । गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥ पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला । बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥ कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला । गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥ त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली । तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥ जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें । देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥ मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर । तुकारामासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥ कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही । जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥ किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य । सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥ त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला । जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥ होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले । तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥ चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला । शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥ कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत । बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥ गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली । महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥ हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला । महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥ समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ । पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥ कोरडया ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला । एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरडया विहिरी ठायीं ॥९८॥ भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती । शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥ ष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा । मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥ गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत । पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥ बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची । घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥ नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला । जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥ कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले । नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥ चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं । कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥ रुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत । समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥ गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली । हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥ हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले । मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥ उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार । अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥ भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत । आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥ ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही । निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥
कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत । अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥ खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें । निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥ तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला । आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥ कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी । मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥ ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला । "नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥ जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर । न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥१७॥ कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला । खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥ दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी । घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥ बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन । संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥ दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक । उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥ गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं । भावभक्तीनें लवलाही ।  जाननस्वामीच्या ॥२२॥ गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला । छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥ द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची । दांभिक भक्ति घुडयाची । कशी ती कथन केली ॥२४॥ एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान । आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥ झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी । येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥ निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला । द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥ आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला । वांचविले गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥ शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची । मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥ स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला । स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥ पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी । वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥ पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ । नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥ विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी । महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥ झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला । पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥३४॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली । पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥ कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा । हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥ बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें । कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥ नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास । नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥ विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला । या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥ अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा । आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥ भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला । मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥ श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश । नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥ कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी। जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥ पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला । कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥ छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा । ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥ सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास । जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥ नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं । केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥ महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला । हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥ बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची । भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥ कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची । कवर डाँक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥ महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला । तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥ कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी । त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥ एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला । दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥ कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी । आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥ गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला । श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥ त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत । परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥ धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत । समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति । दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥ तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला । तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥ केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून । समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥ गजाननाचे कृपें भलें । जाखडयाचें लग्न झालें । कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥ तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला । नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥ पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन । महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥ पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं । आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥ विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर । जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥ जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी । दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥ आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा । अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥ प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर । म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥ वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें । मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥ ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर । धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥ या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला । त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥ मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन । कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥ सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी । बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥ भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई । सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥ पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी । पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥ बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल । त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥ किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर । हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥ या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी । केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥ कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें । बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥ लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या । परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥ त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली । योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥ बसविला शेतसार्‍यावर । समर्थांचा धार्मिक कर । कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥ तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी । जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥ गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना । कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥ समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार । परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥ शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण । केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥ अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें । अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥ कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत । काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥ वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा । भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥ पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी । व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥ लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न । शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥ बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं । माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥ तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें । पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥ माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न । भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥ तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें । एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥ बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार । कसुर्‍याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥ चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन । यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥ ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी । खरे खरेच साक्षात्‌कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥ यावत्‌ कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत । तावत्‌ कालपर्यंत । वर्‍हाड होता सुखी बहु ॥९९॥ जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली । अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्‍हाडाच्या ॥२००॥ विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले । नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्‍हाडांत ॥१॥ वर्‍हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना । म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥ तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन । तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥ म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें । म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥ सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्‍हाड व्हावा निर्धारी । ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्‍हाडी जनांच्या ॥५॥ तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं । पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥ ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल । वर्‍हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥ गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा । कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥ या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य । तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥ दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं । याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥ कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा । त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥ धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून । दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥ भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना । तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥ सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका । शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥ ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस । या वर्‍हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥ एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन । एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥ हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा । नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥ वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर । पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥ सद्‌भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा । प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥ मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर । अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥ तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा । साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥ हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी । येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥ श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥ हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती । महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥ वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत । पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥ जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥ हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी । दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥ जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा । तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥ दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण । साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥ निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र । चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥ दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला । अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥ गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी । बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥ त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा । कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥ ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत । कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥ मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा । तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥ पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर । नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥ उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत । वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥ तेवींच हा वर्‍हाडांत । गजाननस्वामी सद्‌गुरुनाथ । फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥ आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती । अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥ म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥ आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा । दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥ मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट । दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥ आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो । अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥ प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा । समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥ मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज । हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥ जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा । हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥ शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र । ते रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥ त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला । म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥ झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन । करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥ शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत । चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥ हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला । तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥ ॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥ ॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥ ॥समाप्त॥

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती