जोहार मायबाप…


जोहार मायबाप…

 | Updated: 25 Nov 2016, 04:00:00 AM
    
जगण्याला उभारी वाटेल असा कोणताही राजकीय, सामाजिक, धार्मिक दिलासा, संरक्षण किंवा संघटन मागे नसताना जगणं म्हणजे काय असतं, ते अशा उपेक्षित जगण्यातले विदारक सत्य आणि गांभीर्य पाहून कुणालाही जाणवावे. चौदाव्या शतकात संत चोखामेळा यांनी संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारून भक्तिमार्ग अवलंबला नि त्यांनी जो मार्ग दाखवला तो आजही कुणालाही शिरोधार्य वाटावा.

संत तुकारामांनी चोखामेळा यांना उद्देशून लिहिलेला अभंग एक वेदना सांगतो. ‘तुका म्हणे, तुम्ही विचारांचे ग्रंथ, तारिले पतित तेणे किती?’ त्याच भक्तिमार्गाच्या नावेतून चाललेल्या नि जिवंतपणी कर्मठ सनातनी लोकांमुळे यातना सोसणाऱ्या तुकारामांनी ‘एवढ्या पतितांच्या संख्येपुढे तुमचे विचार कसे मांडणार नि त्यांच्या ते कसे पचनी पडणार?’ असे उद्गार काढावेत म्हणजेच तो बुरसट प्रवृत्तीचा निषेध होता. आजही हा प्रश्न आक्टोपससारखा पसरून आहे.

समाजाला उद्देशून विचारताना, स्वतःला डोंगा ऊस म्हणवत, ऊस डोंगा असला तरी त्यातला रस जसा डोंगा नाही, तर मग माझ्या अंतरात विठ्ठलाप्रती असलेला भाव सरळ, निर्मळ कसा नाही? असा सवाल चोखामेळा विचारतात; पण याचे उत्तर समाजाकडे नाही. मी अडाणी आहे. कचरा साफ करणारा. आम्हाला अडाणी लोकांना ते ज्ञान-पुराण नाही कळत. माझ्याकडे माझ्या अंतरात तुझ्याबद्दल शुद्ध भोळा भाव आहे. नि रे केशवा, तुझे नाम गात राहणं एवढंच मला कळतं.
आम्हा ना कळे ज्ञान, ना कळे पुराण । वेदांचे वचन ना कळे आम्हा।।

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझे।।

विठ्ठलनामाचा माथी लागलेला ‘कलंक’ जपत भक्तिमार्गाची कास धरलेल्या ह्या संताने अखेरपर्यंत आपला श्वास-उच्छ्वास अभंगातून व्यक्त केला. अशुद्ध कोण? अस्पृश्य कोण? तू का मी? हा प्रश्न थेट विठ्ठलालाच विचारलाय.

जन्मता विठ्ठल, मरता विठ्ठल । चोखा म्हणे विठ्ठल आदिअंती।।

आदिअंती विठ्ठल साचला । सोवळा तो झाला कोण ना कळे।।

चोखा म्हणे माझा, नवल वाटावे । विठ्ठलापरते आहे कोण।।

संत चोखामेळा देवळाचे आवार लोटून स्वच्छ ठेवत. त्यांच्या आख्यायिका खूप आहेत. त्याहीपेक्षा त्यांच्या अभंगातून विठ्ठल भक्ती नि समाजाने विठ्ठलापासून नि पर्यायाने माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवल्याची वेदना झिरपत राहतेय. 

मंगळवेढा या त्यांच्या गावी तेव्हाच्या अस्पृश्यांची वस्ती गावापासून वेगळा करायला भिंत बांधायचे ठरते. हे कळताच ते गावी जातात. तिथे काम करताना भिंत अंगावर पडून भिंतीखाली चिरडले जातात. 

संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, ही आख्यायिका आपल्या मनावर बिंबवली आहे. 

संत चोखामेळा यांची निधनवार्ता संत नामदेवांच्या कानी पडताच ते मंगळवेढ्याला जातात. अस्थी घेऊन पंढरपूरला येतात आणि जिथे चोखामेळा काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत सबंध दिवस पंढरपूरचा बलुतेदार म्हणून उंबऱ्याबाहेर उभा राहात असे, तेथे विठोबाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीखाली अस्थी पुरतात. त्याच जागी आता संत चोखामेळाची समाधी आहे. संतांचं संतपण अशा कृतीतून दिसते.

आज चोखामेळाचे अभंग चिरंजीव असले, तरी त्यांच्या वाट्याला, जिवंत असताना सन्मान आला नाही. संत नामदेवांचा अभंग मात्र आदरभाव व्यक्त करतो.

चोखा माझा जीव, चोखा माझा भाव । कुलधर्म देव चोखा माझा ।

काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती । मोही आलो व्यक्ती तयासाठी।

माझ्या चोखीयाचे करिती जे ध्यान । तया कधी विघ्न पडो नेदी।

नामदेव अस्थी आणल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पीतांबर।।

संत चोखामेळाचा मेहुणा नि शिष्य संत बंका याने म्हटले आहे,

चोखा चोखट निर्मळा । तया अंगी नाही माला। चोखा प्रेमाचा सागर । चोखा भक्तीचा आगर।

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली। चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती